
मुंबई : राज्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. लोकांवरील बिबट्यांचे वाढते हल्ले आणि लोकांच्या निर्माण झालेला धोका लक्षात मादी बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारच्या वनविभागाने केंद्र सरकारकडे परवानगीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारची मंजुरी आणि केंद्राच्या मार्गदर्शक शिफारशीनुसार लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्याच्या वनविभागाने केंद्र सरकारकडे मादी व नर बिबट्याच्या नसबंदीसाठी परवानगी मागितली. जुन्नर तालुक्यात ३०० बिबटे असल्याची आकडेवारी आहे. राज्याच्या वन्यजीव विभागाकडून बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक पातळीवर प्रस्ताव केंद्रीय वन अतिरिक्त विभागाच्या महासंचालकांकडे पाठवला होता. केंद्राकडून त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने नर आणि मादी बिबट्यांच्या ग्रंथींचा अभ्यास व गर्भनिरोधन यावर भर दिला जाईल. तसेच बिबटप्रवण क्षेत्रातील बिबट्यांच्या हालचाली, खाद्य या बाबींचाही अभ्यास करून संख्येवर नियंत्रण मिळवले जाईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बिबट्यांचा वाढता वावर
जुन्नरसह आंबेगाव, मावळ, शिरूर भागांत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतातील वावर आणि गावकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.