मुंबई : जोवर अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होत नाही तोपर्यंत मी पायात वहाणा घालणार नाही, असा पण केलेल्या कारसेवक विलास भावसार (६०) यांनी अखेर ३२ वर्षांनंतर पायात वहाणा घातल्या.
जळगांवमधील कारसेवक विलास भावसार यांनी १९९२ साली ही प्रतिज्ञा केली होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि इकडे महाराष्ट्रात विलास भावसार यांनी पायात वहाणा सरकवल्या. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी भावसार यांना चपला भेट दिल्या. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भावसार यांना ही भेट दिली. भावसार एक सामान्य कारसेवक आणि परम रामभक्त पानपट्टी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल ते खूप खुश झाले आहेत. १९९२ साली बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर याच ठिकाणी मंदिर बांधून होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही, असा पण त्यांनी केला होता व तो पाळलाही होता.