महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार, अशोक चव्हाण यांनीही सोडला 'हात'; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा, त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री व पक्षाचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडलाय.
महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार, अशोक चव्हाण यांनीही सोडला 'हात'; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
(संग्रहित छायाचित्र)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा, त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री व पक्षाचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडलाय. चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

"मी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे", असे चव्हाण यांनी राजीनामा पत्रात नमूद केले असून ते महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानावे लिहिले आहे. पत्राच्या सुरूवातीला त्यांनी स्वतःचा उल्लेख माजी विधानसभा सदस्य असा केला आहे. "आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे", अशी माहिती त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारेही दिली.  त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आता अशोक चव्हण यांची पुढील राजकीय दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लगले आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. अशातच चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. तथापि, दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. 14 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्यासोबत काही आमदार देखील जातील अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दुसरीकडे, चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनाम का दिला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in