
मुंबई : गेले काही दिवस धुमाकूळ घातल्यानंतर वरुणराजाने काहीशी उसंत घेतली असली तरी आता गणेशोत्सवात तुफान बॅटिंग करण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता असून पुढील पाच दिवस गणपतीवर पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. राजस्थान आणि पंजाबच्या परिसरात त्याचा दबाव असणार आहे. त्यामुळेच येत्या २५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २५ ते २८ ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील २४ तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. १६ ते २१ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील नागरिकांनी पावसाचा तडाखा अनुभवला. मात्र त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.
मंगळवारी मुंबई, ठाण्याला तडाखा
रायगड, रत्नागिरी येथे आजपासून मंगळवारपर्यंत तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मंगळवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सोमवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.