शेतकऱ्यांना सरकार पूर्ण मदत करेल -फडणवीस

शेतकऱ्यांना सरकार पूर्ण मदत करेल -फडणवीस

विरोधी पक्षाने आरोप करण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती घेतलेली नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे

नागपूर : राज्यातील दुष्काळ आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना राज्य सरकार भेदभाव करणार नाही. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून अडचणीच्या परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. कुठल्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना पूर्णपणे मदत करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

विधानसभेत विरोधी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नियम ५७ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकरी मदतीवरून सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी, केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. परंतु, जे तालुके निकषात बसत नाहीत पण तेथे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पैशांतून मदत दिली जाणार आहे. १ हजार २०० महसूल मंडळात दुष्काळ सदृश्यस्थिती घोषित केली आहे. ज्या दुष्काळी तालुक्यांना जी मदत मिळणार आहे तीच मदत दुष्काळ सदृश भागालाही मदत मिळणार आहे, असे स्पष्ट केले.

विरोधी पक्षाने आरोप करण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती घेतलेली नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी १० हजार कोटी रूपये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिले आहेत. यावर्षीही राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा २० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ टक्के आगाऊ रक्कम जमा केली आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना पुन्हा पैसे जात आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटी किंवा अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे, त्या सगळ्या प्रकारच्या नुकसानीची भरपाई आम्ही देणार आहोत. यासंदर्भातील कार्यवाही सुरु झाली आहे. सरकारने दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदतीचे निकष जाहीर केले आहेत. गेल्यावेळी एनडीआरएफच्या दुप्पट मदत आपण दिली होती. त्यामुळे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी आपण देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आजही कुठल्याही परिस्थितीत महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना पूर्णपणे मदत करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in