मुंबई : छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत, त्यांच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही. पण त्यांनी बीडच्या सभेत मला टार्गेट केले. आधी जरांगे-पाटील आणि आता भुजबळ या दोघांनी मला टार्गेट केले आहे. यातून समाजाचे प्रश्न सुटणार असतील तर मला आनंदच आहे. २ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्याची जबाबदारी आता मंत्री भुजबळ यांची, असा टोला विजय वडेट्टीवर यांनी लगावला.
बीड इथे झालेल्या सभेत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध नाही. मी तेव्हा म्हणालो होतो ओबीसीमधून आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण वाढवावे लागेल, नाही तर मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज उपाशी राहतील. पण आता वक्तव्याचा विपर्यास करून मला टार्गेट करण्यात येत आहे. नागपूर इथे झालेला ओबीसी मोर्चा यशस्वी झाल्याने भाजपने मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना सोडले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. आधी निवडक नोंदी होत्या. पण २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे. दोन शासन निर्णय काढण्यात आले त्यातील पात्र हा शब्द काढण्यात आला आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली.
सत्ताधारी जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत आहे पण शासन निर्णय तर तुमच्या सरकारने काढला आहे. सरकारमध्ये भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, अतुल सावे मंत्री आहेत. हा शासननिर्णय त्यांनी रद्द करून घेतला पाहिजे. ते न करता इतरांवर टीका करून काय उपयोग, असा सवाल केला.