मराठवाड्यात भूजल पातळी खालावली; नांदेड मात्र वाचले

मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ६१ तालुक्यांत जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस कमी पडला आहे.
मराठवाड्यात भूजल पातळी खालावली; नांदेड मात्र वाचले

संभाजीनगर : मराठवाड्यात नांदेड वगळता इतरत्र सरासरी भूजल पातळी १.०१ मीटरने खालावली असल्याची माहिती सोमवारी सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या पाच वर्षांत पावसाळ्यानंतर येथील सरासरी भूजल पातळी ४.०३ मीटर होती. मात्र २०२३ पावसाळ्यानंतर ही पातळी ५.०४ मीटरपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले आहे.

संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ६१ तालुक्यांत जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस कमी पडला आहे. यापैकी १९ तालुक्यांत तर अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये ३० ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालनात भूजल पातळी ३.९९ मीटरवरून ६.६८ मीटरपर्यंत घसरली आहे.

म्हणजे येथे पाणी तब्बल २.६९ मीटर खाली गेले आहे. सरकारने या परिसरातील ८७५ विहिरींची पाहणी करून हा अहवाल तयार केला आहे. संभाजीनगरमध्ये देखील भूजल पातळी १.७३ मीटरने घसरली आहे. आता तेथे ६.८८ मीटर खोलीवर पाणी गेले आहे, जे पूर्वी ५.१५ मीटर खोलीवर होते. तसेच धाराशिव येथे पाण्याची पातळी ३.८५ मीटरवरून ५.५८ मीटरपर्यंत खाली गेली आहे. दरम्यान नांदेडची भूजल पातळी मात्र १.१२ मीटरने वाढली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in