

उरण : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. चीन आणि आखाती देशांतून आयात होणाऱ्या मासेमारी साहित्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जाळी, शिसे आणि नायलॉन धाग्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे.
मासेमारीसाठी लागणारी जाळी, नायलॉन धागा (यान), शिसे आणि दोऱ्या यांसारखे बहुतांश साहित्य चीन व आखाती देशांतून आयात केले जाते. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक धोक्यात आली आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखातातील
मालवाहतूक कमी केली असून काहींनी ती पूर्णपणे थांबवली आहे. परिणामी च्च्या मालाची उपलब्धता घटली असून स्थानिक बाजारपेठेत साहित्याचे दर कडाडले आहेत. मासेमारी साहित्याच्या दरवाढीचा थेट परिणाम मच्छीमारांवर होत आहे. पूर्वी सुमारे ४२० रुपये प्रति किलो मिळणारी जाळी आता सुमारे ६० रुपयांनी महागली आहे. शिशाचा दर पूर्वी २१० रुपये प्रति किलो होता, त्यात आता ४० रुपयांची वाढ झाली आहे. एका पर्ससीन मासेमारी बोटीला साधारणपणे सहा टन जाळी आणि दोन टन शिसे लागते. त्यामुळे वाढलेल्या दरांचा फटका लाखो रुपयांत बसत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काळात मासेमारीचा खर्च परवडण्यापलीकडे जाईल, अशी भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.
मासेमारीसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल परदेशातून येतो. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रमेश नाखवा, सचिव वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशन