
मुंबई : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय म्हणजे मराठीला मागे टाकण्याचा आणि भारतीय संविधानात नमूद असलेल्या भाषिक विविधतेचा अंत करण्याचा भाजप-आरएसएसचा अजेंडा आहे, असा आरोप राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला.
हा केवळ भाषिक धोरणाचा मुद्दा नाही. भाजप आणि आरएसएसचा अजेंडा म्हणजे इतर सर्व भाषा नष्ट करून संपूर्ण देशात हिंदीचे वर्चस्व प्रस्थापित करणे आहे. पण आम्ही मराठीचा गळा दाबू देणार नाही. हे फसवे षडयंत्र आम्ही हाणून पाडू. आम्ही हिंदीचा आदर करतो, पण ती जबरदस्तीने लादली जाणे आम्हाला मान्य नाही. मराठी ही केवळ आमची भाषा नाही, ती आमची ओळख आणि जीवनशैली आहे, असे सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सपकाळ यांनी सांगितले की, काँग्रेसने महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना पत्र लिहून या हिंदी भाषेच्या सक्ती आदेशाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सरकारवर हा आदेश मागे घेण्यासाठी दबाव आणता येईल.