आरएसएसचा सरसंघचालक दलित, मुस्लिम कधी होणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींना सवाल

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष दलित समाजाचा आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला यांना कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.
हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष दलित समाजाचा आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला यांना कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. गेल्या ११ वर्षांत मोदींनी हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण यांच्यात द्वेष पसरवण्याचे काम केले, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.

मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे. या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झालेले आहे, काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे मोदीच काय कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे. नरेंद्र मोदी हे ११ वर्षांपासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. मोदींनी गेल्या ११ वर्षांत एकाही मुस्लिम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे, ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. कोराना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली. आता अमेरिकेच्या टॅरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे. देशातील गरीबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

‘सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा’

भाजप, रा. स्व. संघ यांना बाबासाहेबांबद्दल किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहीत नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही. प्रत्येक जाती, धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते. सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, ‘आता विश्वात्मके देवे’, हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे तत्त्वज्ञान आहे, तेच तत्त्वज्ञान काँग्रेसचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in