महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून देशामध्ये पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : हवामान विभागाकडून देशामध्ये पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ‘आयएमडी’ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याबरोबरच राजस्थानमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला असून, राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात वादळी वारे

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो, ऑरेंज अलर्ट

अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारे वाहणार असून, तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे, तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in