हेमा उपाध्याय-हरिष भंबानी दुहेरी हत्याकांड प्रकरण : कलाकार चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेला चिंतन उपाध्यायने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
हेमा उपाध्याय-हरिष भंबानी दुहेरी हत्याकांड प्रकरण : कलाकार चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

मुंबई : संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडवून दिलेल्या हेमा उपाध्याय-हरिष भंबानी दुहेरी हत्याकांड प्रकरणात कलाकार चिंतन उपाध्यायने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विभक्त पत्नी हेमा व तिचे वकिल हरीश भंबानी या दोघांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेला चिंतन उपाध्यायने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अपील प्रलंबित असेपर्यंत जामीन मंजूर करण्याची विनंती केली आहे.

चिंतन उपाध्यायच्या अपीलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर येत्या बुधवारी (२५ ऑक्टोबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे. हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरीश भंबानी हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेला चिंतन उपाध्याय व इतर तीन दोषींना दिंडोशी सत्र न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच चिंतनला २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. या शिक्षेला चिंतनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दुहेरी हत्याकांड घडून आठ वर्षे उलटल्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. १२ डिसेंबर २०१५ रोजी कांदिवली येथील नाल्यात फेकलेल्या बॉक्समध्ये हेमा व भंबानी या दोघांचे मृतदेह सापडले होते. चिंतन उपाध्यायने वैवाहिक वादातून दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचे सिद्ध झाले आहे. त्याआधारे न्यायालयाने चिंतनला जन्मठेप सुनावली, तर विजय राजभर, प्रदीप राजभर व शिवकुमार राजभर या तिघांना हत्या, पुरावे नष्ट करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

logo
marathi.freepressjournal.in