सत्ताधाऱ्यांना आव्हान! बीएमसीची निवडणूक लावा, लोकांना लोकप्रतिनिधी निवडू द्या: वर्षा गायकवाड

नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्या बोलत होत्या.
सत्ताधाऱ्यांना आव्हान! बीएमसीची निवडणूक लावा, लोकांना लोकप्रतिनिधी निवडू द्या: वर्षा गायकवाड
Published on

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील वाढत्या प्रदुषणावरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. मुंबईतील वायूप्रदुषणाचं संकट, खुल्या जागा कमी होणं, तसंच नागरी सेवांचा ढासळलेला दर्जा याबाबत त्यांनी सरकारला चोहोबाजूंनी घेरलं. यावेळी मुंबईत प्राणवायू आणि आजूबाजूच्या राजकीय वातावरणातील विषारीपणा हा लक्षणीयरित्या वाढत असल्याचं देखील त्या म्हणाल्या. रस्ते घोटाळा आणि प्रशासकांद्वारे चालवला जाणारा असंविधानीक कारभार, यावर देखील वर्षा गायकवाड यांनी बोट ठेवलं. नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्या बोलत होत्या.

मुंबईतील हवा प्रदुषणावर बोलताना त्यांनी सरकारवर चोहोबाजूंनी हल्ला केला. मुंबईत सुरु असलेल्या सुरु असलेल्या अनियोजित विकासकामांमुळे हवेत धुळीचे कण पसरल्याने मुंबईतील हवा प्रदुषित होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावर उपाययोजना म्हणून सरकारने पाण्याचा फवारा मारुन तात्पूरता उपाययोजना केल्या. याने फरक पडणार आहे का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. येणाऱ्या सहा महिन्यात मुंबईतील ४०० किलोमिटरचे रस्ते काँक्रेटिकरण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(तत्कालीन नगरविकास मंत्री) यांनी दिले होत. आज दोन वर्षे झाली तरी ती मागणी पूर्ण केली नसल्याची आठवण देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करुन दिली.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी राज्यसरकारच्या जाहिरातबाजीवर देखील भाष्य केलं. हे सराकर फक्त जाहिरातबाजीत तरबेज असल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेत गेलेल्या लोकप्रतिनिधींना निधी मिळतो. मात्र विरोधातील लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकांद्वारे चालवला जात आहे.सरकार मुंबई महापाालिकेच्या निवडणुका का लावत नाही? मुंबई महापालिकेची निवडणूक लावा, लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी निवडू द्या, असं आव्हान देखील वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना केलं.

logo
marathi.freepressjournal.in