
मुंबई : राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसने विधानसभेत केला. परंतु राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, असे काहीच घडले नाही अशा राणा भीमदेवी थाटात निवेदन केले. पण सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपच्या अत्यंत जवळ पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याबरोबर हनी ट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच गडद झाले आहे. हनी ट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात अडकला आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे, पण हनी ट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे हनी ट्रॅप प्रकरणाचा पेनड्राईव्ह बॉम्ब त्यांनी सभागृहात फोडला. मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, असे काही नाही, ठोस पुरावे आणायचे आणि सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करायची, असे आवाहन त्यांनी काँग्रेसला दिले. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा फास सत्ताधारी पक्षाच्या गळ्यात अडकलाय, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे.