
मुंबई : मला मंत्रिपद हवे आहे, पण ते जर इतर कोणाला हटवून मिळत असेल तर नको, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील धनंजय मुंडे यांना काढून भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येईल, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
त्यावर भुजबळ यांनी सांगितले की, ‘मी जाणूनबुजून काही काळ राजकारणातून विश्रांती घेतली होती. मी १९६७ पासून सक्रिय आहे, पण कधीकधी राजकीय मनाला विश्रांतीची गरज असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला मंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते, मात्र सात ते आठ दिवस वाट पाहू आणि चर्चा करू असे बोलणे झाले होते. मला कोणाच्या जागी पोस्ट नको. यापुढे आपण सामाजिक कार्यावर भर देणार आहोत.
शुक्रवारी समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमांबाबत ते म्हणाले, प्रतिवर्षीप्रमाणे मी उद्या सकाळी (सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी) नायगावला जाईन. मुख्यमंत्री आणि इतरही तिथे उपस्थित असतील. त्यानंतर चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येईल, जिथे शरद पवार उपस्थित राहतील.