महाविकास आघाडी एकत्र लढल्यास चित्र नक्कीच वेगळे असेल; अजित पवार यांचा विश्वास

पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘या सरकारबद्दल राज्याच्या जनतेच्या मनात नाराजी आहे. ही नाराजी पदोपदी जाणवत आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढल्यास चित्र नक्कीच वेगळे असेल; अजित पवार यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविल्यास चित्र नक्कीच वेगळे असू शकते. याबाबत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील, असे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘या सरकारबद्दल राज्याच्या जनतेच्या मनात नाराजी आहे. ही नाराजी पदोपदी जाणवत आहे. ज्या शिवसैनिकांच्या बळावर आमदार निवडून दिले, त्यांनीच बंडखोरी केली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना राजकारणात पुढे कधीच यश मिळत नाही, हा इतिहास आहे. मुळात महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्यात आली, तर चित्र वेगळे असू शकते. याबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील. आगामी अधिवेशनात लोकांच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा ‘लवकरच’ हा अतिशय आवडीचा शब्द आहे. त्यांना मंत्रिमंडळाबाबत कधीही विचारा ते लवकरच, असे उत्तर देत असत. आता खातेवाटपाबाबत याच उत्तराची पुनरावृत्ती होत आहे. अधिवेशनात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सही करावी लागते. त्यामुळे त्यांनी अधिवेशनापूर्वी खातेवाटप करणे आवश्यक ठरते. स्वातंत्र्यदिनाला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करत असतात; मात्र यंदा पालकमंत्रीच नाहीत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना पालकमंत्री नाहीत, अशी अवस्था आहे,” असा चिमटाही त्यांनी काढला.

पार्थनेच ठरवावे

“नेत्यांनी फिरावे, लोकांना भेटावे; मात्र आपण कोणावर काम कर म्हणून बळजबरी करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार याने काय करायला हवे, हे त्यांनी त्यांचे ठरवायला हवे. त्यावर मी त्यांना सल्ला किंवा बळजबरी करत नाही,” असे उत्तरही त्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in