राज्यात पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असे आयएमडीने म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांसह राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला आहे, गारपिटीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असे आयएमडीने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास एवढा असू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

पाऊस जोर धरणार

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह देशभरात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला आहे. मात्र, सोलापूर अद्यापही चाळीस अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे, या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून, फळबागांच् मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जोरदार वारे वाहणार

याशिवाय १५ आणि १६ एप्रिलला ओदिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तर गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात बिहार आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी प्रतितास ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in