राज्यातील ११ मतदारसंघांत ५२.९३ टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक, तर शिरुरमध्ये कमी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी राज्यात सुमारे ५२.९३ टक्के मतदान झाले.
राज्यातील ११ मतदारसंघांत ५२.९३ टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक, तर शिरुरमध्ये कमी मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी राज्यात सुमारे ५२.९३ टक्के मतदान झाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, तसेच पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, सुजय विखे यांच्यासह २९८ उमेदवारांचे भवितव्य मतदानाच्या चौथ्या टप्प्यात ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

मतदान पार पडलेल्या ११ मतदारसंघात एकूण २९८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. संभाजीनगर, मावळ आणि शिर्डी या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा सामना आहे. तर शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने आहेत. संभाजीनगरमध्ये नेहमीप्रमाणे तिरंगी लढत होत आहे.

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदारसंघात २९ हजार २८४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सर्वाधिक ४१ उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वात कमी ११ उमेदवार नंदुरबार मतदारसंघात आहेत.

नंदुरबारमध्ये सर्वाधिक, तर शिरुरमध्ये कमी मतदान

राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये ६०.६० टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान शिरुरमध्ये ४३.८९ टक्के इतके झाले आहे.

मतदानाची टक्केवारी

  • नंदुरबार - ६०.६० टक्के

  • जळगाव - ५१.९८ टक्के

  • रावेर -५५.३६ टक्के

  • जालना - ५८.८५ टक्के

  • औरंगाबाद - ५४.०२ टक्के

  • मावळ - ४६.०३ टक्के

  • पुणे - ४४.९० टक्के

  • शिरूर - ४३.८९ टक्के

  • अहमदनगर - ५३.२७ टक्के

  • शिर्डी - ५२.२७ टक्के

  • बीड - ५८.२१ टक्के

logo
marathi.freepressjournal.in