स्वदेशात बनावटीच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन

हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य करणे, नवीन उद्योजक आणि नोकऱ्या निर्माण करणे यासाठी पंतप्रधान मोदींचे हायड्रोजन व्हिजन भारतासाठी महत्त्वाचे आहे
स्वदेशात बनावटीच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन

केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); राज्यमंत्री पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी रविवारी पुण्यात केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (KPIT-CSIR) ने विकसित केलेली भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशी बनावटीच्या, पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन केले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांना सांगितले की, आत्मनिर्भर म्हणजे परवडण्याजोगी आणि सहजपणे उपलब्ध स्वच्छ ऊर्जा, हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य करणे, नवीन उद्योजक आणि नोकऱ्या निर्माण करणे यासाठी पंतप्रधान मोदींचे हायड्रोजन व्हिजन भारतासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हरित हायड्रोजन हे एक उत्कृष्ट तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मिती माध्यम आहे जे रिफायनिंग उद्योग, खत उद्योग, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग आणि अवजड व्यावसायिक वाहतूक क्षेत्रातील वायू उत्सर्जनातून निघणाऱा कार्बन कमी करण्याचे कार्य करते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून बस चालण्यासाठी आवश्यक वीज निर्माण करते आणि बसमधून बाहेर टाकला जाणारा घटक केवळ पाणी आहे, त्यामुळे ही बस पर्यावरणास अनुकूल असे वाहतुकीचे माध्यम आहे.

तुलनात्मक दृष्ट्या पाहता लांबपल्ल्याच्या मार्गांवर धावणारी एकच डिझेल बस सर्व सामान्यरित्या वर्षभरात १०० टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जित करते आणि भारतात अशा दहा लाखांहून अधिक बस आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इंधन सेल वाहनांची उच्च कार्यक्षमता आणि हायड्रोजनची उच्च ऊर्जा घनता हे सुनिश्चित करते की इंधन सेल ट्रक आणि बसेससाठी रुपये प्रति किलोमीटरचा परिचालन खर्च डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी आहे. यामुळे भारतात मालवाहतूक क्रांती होऊ शकते. शिवाय, इंधन सेल वाहने शून्य ग्रीन-हाऊस गॅस उत्सर्जनाची देखील हमी देतात. मंत्री महोदयांनी केपीआयटी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या संयुक्त विकास प्रयत्नांचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील पराक्रम जगातील सर्वोत्कृष्ट असून कमी खर्चिक असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

भारतासाठी हायड्रोजनचे महत्त्व लक्षात घेता १५ ऑगस्ट २०२१रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे बाबत केलेल्या घोषणेची आठवण डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी करून दिली.

१२-१४ टक्के कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे उत्सर्जन

मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की, नजीकच्या काळात हायड्रोजन इंधनाचे महत्व वाढेल कारण भारतातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक ही रस्ते मार्गाने होते ज्यात मोठ्या प्रमाणात अवजड व्यावसायिक वाहनांचा वापर केला जातो. डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, सुमारे १२-१४ टक्के कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे(CO2) उत्सर्जन आणि सूक्ष्मकणांचे उत्सर्जन डिझेलवर चालणाऱ्या अवजड व्यावसायिक वाहनांमधून होते आणि हे विकेंद्रित स्वरूपाचे उत्सर्जन असल्या कारणाने आहेत ते थांबवणे कठीण आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in