
मुंबई : राज्यात इन्फ्लुएन्झा आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. जानेवारी २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ या १२ महिन्यांच्या काळात इन्फ्लुएन्झाने तब्बल ७१ जणांचा बळी घेतला आहे. तर १२ महिन्यांत २,३४८ जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इन्फ्लुएन्झा हा विषाणामुळे होणारा आजार आहे. इन्फ्लुएन्झा आजाराचे एच१ एन१, एच२ एन२ आणि एच३ एच२ असे उपप्रकार आहेत. यामध्ये ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणि न्यूमोनिया आदी लक्षणे आढळतात. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दीर्घकाळ दिसून आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इन्फ्युएन्झाला आळा घालण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना व्हीसीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
अशा आहेत उपाययोजना
फ्ल्यूसदृश रुग्णांना वर्गीकरणानुसार विलगीकरण कक्ष स्थापन
आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध
डॉक्टर्सना क्लिनिकल मॅनेजमेंटबाबत आवश्यक पुनर्प्रशिक्षण
सर्व जिल्ह्यांना खबरदारीबाबत आवश्यक सूचना निर्गमित
डेथ ऑडिट करण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना
एकूण संशयित रुग्ण
ऑसेलमॅटवीर दिलेले संशयित फ्ल्यू रुग्ण - २३,८९,५८७
एच१ एन१ बाधित रुग्णांची संख्या - ६,०९५
एकूण मृत्यू - ६,०९५