इंदापूरमध्ये विहिरीचं काम सुरु असताना विहिरीच्या रिंगसह मातीचा ढिगारा कोसळल्याने त्यात चार मजूर दबले गेले होते. यानंतर याठिकाणी मजुरांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. गाडल्या गेलेल्या चार मजुरांपैकी ३ जणांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. पहिला मृतदेह घटना घडल्यानंतर ६५ तासांनी सापडला होता. त्यानंतर साधारणा दोन तासांनी आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. आत अडकलेल्या 4 पैकी 3 मजुरांचे मृतदेह सापडले आहे. मात्र, एका मजुराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या मजुराचा शोध घेतला जात आहे. चौथ्या मजुराचा मृतदेह जोवर सापडत नाही. तोवर रुग्णवाहिका घटनास्थळावरुन हलू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली आहे.
जावेद अकबर मुलाणी, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज चव्हाण असं या चार मजुरांचं नाव आहे. इंदापूरच्या म्हसोबावाडी या गावात विहिरीची रिंग मारण्याचं काम सुरु होतं. यावेळी रिंग कोसळल्यानं आणि त्यासोबत मातीचा ढिगारा कोसळल्याने हे चार मजूर कालपासून या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. संध्याकाळी हे मजूर आपल्या घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. शेवटी विहीरीचं काम सुरु असलेल्या ठिकाणी हा शोध थांबला. त्या ठिकाणी कामगारांच्या दुचाकी दिसून आल्या, मात्र चारही जणांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. यानंतर हे चारही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली गेली.
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. यानंतर या दुर्घटनेत अडकेल्या व्यक्तींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अडकलेले चारही नागरीक हे बेलवाडी या गावचे रहिवासी आहेत. म्हसोबावाडी येथे सुरु असलेलं विहिरीचं काम हे बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.