
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे १८.४८ टीएमसी क्षमतेचे गिरणा धरण तब्बल ९६ टक्के भरले असून, चालू पावसामुळे ते कधीही शंभर टक्के क्षमतेने भरणार आहे. त्याचबरोबर वाघूर धरणातही ८४ टक्के पाणीसाठा झाल्याने जळगावकरांच्या दोन वर्षांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील १४ पैकी ७ मध्यम प्रकल्प तर धुळे जिल्ह्यातील १४ पैकी ५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. १९६८ मध्ये बांधलेले गिरणा धरणावर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर व ५६ गावे, मालेगाव शहर व तालुक्यातील २५ गावे, तसेच जळगाव जिल्ह्यातील १५३ गावे, १३० पाणीपुरवठा योजना आणि ७ नगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. गिरणा पूर्ण क्षमतेने भरल्यास या सर्वांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. वाघूर नदीवरील वाघूर धरणात ८४.५५% पाणीसाठा झाला आहे. तापी व पूर्णा नद्यांना सध्या पूर असून तापीवरील हतनूर धरणाचे १० गेट उघडले आहेत. यातून ५० हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेट बंद केल्यास ९ टीएमसी क्षमतेचे हे धरण लवकरच भरू शकते.
जळगाव जिल्ह्यातील स्थिती
जळगावातील १४ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, अंजनी बोरी व मन्याड हे सात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
इतर प्रकल्प :
मोर – ८५%
हिवरा – ८२%
बहुळा – ८५%
अग्नावती – ४०%
गुळ – ६७%
भोकरबारी – २२%
शेळगाव बॅरेज – १४%
धुळे जिल्ह्यातील स्थिती
धुळ्यातील १४ मध्यम प्रकल्पांपैकी पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली व मुकटी हे पाच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
इतर प्रकल्प :
बुराई – ८०%
करवंद – ८७%
अक्कलपाडा – ९१%
अनेर – ६८%
अमरावती – ५३%
वाडीशेवाडी – ४२%
सोनवद – २३%
सुरवाडे बॅरेज – ४७%
सारंगखेडा बॅरेज – ३५%