कराड : सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, निरा देवधर तर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या उपसा सिंचन प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात १२१ कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील जिहे कठिपूर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहूल कूल, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याधिकारी याशनी नागराजन, सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.