जरांगे-पाटील यांचा आमरण उपोषणाचा पुन्हा इशारा; २० जुलैला बैठक

मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण न मिळाल्यास येत्या २१ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देतानाच, आता मागे हटणार नाही, अशी ग्वाही मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी दिली.
जरांगे-पाटील यांचा आमरण उपोषणाचा पुन्हा इशारा; २० जुलैला बैठक
Published on

संभाजीनगर/ठाणे : मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण न मिळाल्यास येत्या २१ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देतानाच, आता मागे हटणार नाही, अशी ग्वाही मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी दिली. मराठवाड्यातील त्यांच्या महाशांतता रॅलीची छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता झाली. दुसरीकडे जरांगे-पाटील यांनी थोडा संयम बाळगावा, अशी अपेक्षा ठाण्याचे पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या, अशा मागण्या जरांगे-पाटील यांनी केल्या. येत्या २० जुलै रोजी राज्यातील मराठा नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजिण्यात येईल व या बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविली जाईल, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.

जरांगे-पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु त्यांनी एकाच महिन्याचा कालावधी दिला. ते सातत्याने म्हणत आहेत की, मुख्यमंत्र्यांवर त्यांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीच आदेश दिलेले आहेत की एकही दिवस वाया न घालवता याबाबतीतलं काम चालू ठेवा. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही, अशी माहिती पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी ठाण्यात दिली आहे. जरांगे-पाटील यांनी संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in