शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून भिडले जयंत पाटील; यांच्या प्रश्नाला अजित पवारांचे कडक उत्तर

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व सदस्य विदर्भात आले. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे असताना विरोधकांनी या अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर प्रस्ताव मांडलाच नाही.
शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून भिडले जयंत पाटील; यांच्या प्रश्नाला अजित पवारांचे कडक उत्तर

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच भिडले. शेवटच्या दिवशी केवळ ३ प्रस्ताव मांडले. या प्रस्तावांवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. विशेषत: विदर्भासंबंधीचा प्रस्ताव न आल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत होते. त्यावेळी या मुद्यावरून तुम्हा दोघांपैकी कोण बोलायचे ते एकदा ठरवा, असा टोला लगावला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले आणि त्यांनी सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका घेण्याचा धंदा बंद करा, असे कडक उत्तर दिले.

शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. अधिवेशनाचा बुधवारी अखेरचा दिवस असल्याने सत्ताधाऱ्यांकडून महत्त्वाचे प्रस्ताव येतील, असे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने ३ प्रस्ताव ठेवले. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. एक तर १० दिवसांचे अधिवेशन घेतले आणि इकडून एक प्रस्ताव, तिकडून दोन प्रस्ताव हे बरोबर नाही. त्यापेक्षा एक महिन्याचे अधिवेशन घ्या आणि चर्चा करा, असे ते म्हणाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी आता तुमच्यापैकी कोण आधी बोलायचे, हे आधी ठरवा, असा टोला लगावला.

हा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्मी लागला आणि त्यांनी लगेचच आमच्यात अंडरस्टँडिंग एकदम चांगले आहे. त्यामुळे कसे बोलायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. खरे तर अंतिम आठवडा प्रस्ताव कालच आला होता. त्यावेळी विरोधी पक्षाला आज अधिवेशन संपणार, याची कल्पना होती. त्यावेळीच विरोधकांनी सांगायला पाहिजे होते. सभागृहात एक बोलायचे आणि बाहेर एक बोलायचे, हे धंदे बंद करा, असे कडक उत्तर दिले. विदर्भात अधिवेशन सुरू आहे. मग विदर्भाबद्दल उत्तर आले पाहिजे, म्हणून आम्ही ठरवले. त्यातूनच प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, असे म्हटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना विरोधकांनाच विदर्भात येऊन विदर्भाचा विसर पडल्याचा आरोप केला.

विरोधकांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडलाच नाही

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व सदस्य विदर्भात आले. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे असताना विरोधकांनी या अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर प्रस्ताव मांडलाच नाही. खरे तर अंतिम आठवड्यात विदर्भाच्या चर्चेवर प्रस्ताव दिला जातो. परंतु अधिवेशन काळात एकही प्रस्ताव आला नाही. किमान विरोधी पक्षनेते आणि नाना पटोले यांनी प्रस्ताव मांडायला हवा होता. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सभागृहाबाहेर बोलतात. मात्र, सभागृहात कधीच बोलत नाहीत. विरोधकांना विदर्भाचा विसर पडणे अत्यंत खेदजनक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in