
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली असून, दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर सहप्रतोदपदी उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेत्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे. रोहित पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रमुख प्रतोदपद देण्यात आले आहे. ते सर्वात तरुण प्रतोद ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेत एण्ट्री घेणाऱ्या रोहित पाटील यांनी संसदीय कारकीर्दीची सुरुवात करतानाच स्वत:च्या नावावर एक विक्रम केला आहे. त्यांच्यासोबत उत्तमराव जानकर यांच्यावर प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
मात्र, विधिमंडळाचे नेते बैठकीला उपस्थित नसल्याने विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. हिवाळी अधिवेशनाच्या काळात या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
रविवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळातील १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. दहावे संदीप क्षीरसागर असून त्यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्कार कार्यक्रम असल्याने या बैठकीला अनुपस्थित राहण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती. तसेच आमचे संख्याबळ कमी असले तरी जनतेचे प्रश्न मांडण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे आणि गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू, असे जयंत पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील, तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.
निवडणूक आयोगाने केला माहिती लपवण्याचा गुन्हा
विधानसभा निवडणुकीत ५ वाजेनंतर ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढलेले आहे. मतदान झाल्यानंतर एवढ्या प्रमाणात मतदान वाढत असेल, तर ती चिंतेची बाब आहे. याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली आहे. हे मतदान कसे वाढले, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. अतिरिक्त वाढलेल्या मतदानाची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांनंतर त्यांची वेबसाइट बंद केली. लोकांना माहिती उपलब्ध होणार नाही, याची काळजी घेतली. हा गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केला आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.