एकही इंच जमीन महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्री बोम्मईंबद्दल काय म्हणाले विरोधक?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्य केले आणि महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले.
एकही इंच जमीन महाराष्ट्राला देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्री बोम्मईंबद्दल काय म्हणाले विरोधक?

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी समज दिल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्री बोम्मई कर्नाटक विधिंडळात म्हणाले की, "इंचभरही जमीन महाराष्ट्राला देणार नाही. याबाबतचा ठरावही विधिमंडळात मांडण्यात येईल. राज्याच्या सीमा, पाणी आणि भाषा याबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत." तर याबाबत कर्नाटकच्या विरोधी पक्षांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला. मात्र, यावरून आता महाराष्ट्रातले वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर याचे पडसाद उमटले.

या वादावर विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले की, "बेळगाव, कारवार, निपाणी तसेच सीमाभागातील एक-एक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहीजे. यासाठी या हिवाळी अधिवेशनात ठराव मांडून तो नक्की मंजूर केला जाईल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसे प्रत्युत्तर राज्य सरकारने द्यावे, आम्ही पाठिंबा देऊ. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यातील नागरिकांना बरे वाटावे, म्हणून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. आमची मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की, त्यांनी अशीच आक्रमक भूमिका घ्यायला हवी."

यावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री शंभुराजे देसाई म्हणाले की, "आमचा संयम आता सुटत चालला आहे. असेच जर चालू राहिले तर आम्हीही उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करू" असा इशारा दिला. ते पुढे म्हणाले की, "बोम्मईंची भाषा अरेरावी आणि उद्दामपणाची. सहन करण्याची पण एक मर्यादा असते. आमचा संयम आता सुटत चालला आहे. राज्यातील कोयना व कृष्णा नदीतून पाणी देण्यात येते. पाण्यासाठी त्यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात येते. त्यांचे वागणे असेच राहिले तर उन्हाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करावा लागेल," असा थेट इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in