
काही दिवसांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघाच्या (Kasaba By-Election) आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. तसेच, पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचेही निधन झाले. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोनही मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली. यानंतर आता या दोनही निवडणुका बिनविरोध होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कसबा पेठ मतदारसंघामध्ये भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता महाविकास आघाडीच्या हालचाली पाहता, ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केल्याची माहिती देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी ही बातमी वाचा
Mukta Tilak : कर्करोगाशी दोन हात करताना कर्तव्य बजावणाऱ्या मुक्ता टिळक यांचे निधन
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत आहे. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली. यासंदर्भात, येत्या काही दिवसात सचिन अहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. शिंदे गटाविरोधात असलेल्या वादाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, या निवडणुका बिनविरोध होतील का? याबाबत शंका व्यक्त केली होती.