खुलताबादचे ‘रत्नपूर’ नामांतर करणार! मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असतानाच आता खुलताबादचे नामांतर होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचे संग्रहित छायाचित्र
मंत्री संजय शिरसाट यांचे संग्रहित छायाचित्र ANI
Published on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असतानाच आता खुलताबादचे नामांतर होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खुलताबादचे 'रत्नपूर' असे नामकरण केले जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

बजरंग दलासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. या कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात अलीकडेच दंगल झाली. मात्र, ही कबर संरक्षित असून ती हटवता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले होते.

शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचे पूर्वी खडकी असे नाव होते. कालांतराने त्याचे नाव औरंगाबाद असे झाले. त्याचप्रमाणे खुलताबादचे नाव पूर्वी ‘रत्नपूर’ होते. कालांतराने ते खुलताबाद झाले. औरंगजेबाने जे जे कारनामे केले त्यात शहरांची नावे बदलण्याचा प्रकारही त्याने केला. त्याने अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिव, नगरचाही त्यात समावेश होता.

आपल्या राज्यात ज्या ज्या शहरांच्या, ठिकाणांच्या नावात ‘बाद-बाद’ असा उल्लेख आहे ती सर्व नावे बदलली जातील. महायुती सरकार नावे बदलण्याची प्रक्रिया हाती घेत आहे. त्यानुसार खुलताबादचे ‘रत्नपूर’ असे नाव असले पाहिजे. कारण तेच नाव पूर्वीही होते. औरंगाबादचे नाव बदलले आहे तसेच आता खुलताबादचे बदलले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे शिरसाट म्हणाले.

स्मारक उभारणार!

शिरसाट म्हणाले, खुलताबादमध्ये ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे तिथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत आमच्याकडे निवेदने आली आहेत. त्यानुसार सरकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार आहे. औरंगजेबाने ज्या ज्या गावांची, शहरांची नावे बदलली ती सर्व नावे बदलली जातील. राज्य सरकारने याआधी औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ व अहमदनगरचे ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in