मुंबई : पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरुन हटवून मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे या खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते. तर मंत्री कोकाटे यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे कळते.
पावसाळी अधिवेशनात विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंत्री कोकाटे यांच्यावर त्यामुळे चौफेर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, कोकाटे यांनी या आरोपांचे खंडन करत आपण मोबाइलवर येणारी जाहिरात स्कीप करत होतो, अशी सारवासारव केली. मात्र, विरोधकांच्या हाती यामुळे आयतेच कोलित मिळाले असून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याप्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार याबाबत निर्णय घेतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दोन - तीन दिवसांत निर्णय
अजित पवार, सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु, अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते.