

कोल्हापूर : बीडमधील मस्साजोग प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती झालीय का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाटगावचे माजी सरपंच गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा अजून कोणताही मागमूस लागत नाही. पोलिसांना देखील तपासात अद्याप कोणतेच यश आलेले नाही. त्यामुळे संबधित माजी सरपंचांचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. दोन महिन्यांपासून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, मात्र अजून पिळणकर यांचे काय झाले हे पुढे आलेले नाही. काही दिवसांपूर्वी पाटगाव भागात जळालेल्या अवस्थेत काही हाडे सापडली होती. मात्र, त्याचा अहवाल येणे अजूनही बाकी आहे. ती हाडं एखाद्या जनावरांची असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी महेश पिळणकर यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पोलीस काहीही माहिती देत नाहीत
बीडच्या मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी नेमके काय घडले ते सांगितले होते. मात्र कोल्हापूरच्या या प्रकरणात पोलीस कोणतीही माहिती देत नाहीत. आम्ही पोलिसांना सर्व मदत केली आहे, मात्र तपासात काहीच प्रगती नाही. त्यामुळे मस्साजोगपेक्षाही पुढे गेलेले हे प्रकरण असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे यांनी म्हटले आहे.
राजकीय बाजूंनी तपास करणार
महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले. पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पिळणकर यांच्या कुटुंबाला दिले. महेश पिळणकर हे लोकप्रिय सरपंच होते. पाटगाव भागात त्यांची जोरदार चर्चा असायची. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची ते तयारी करत होते. त्यामुळे राजकीय आणि इतर सर्वच बाजुंनी तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र जोपर्यंत पिळणकर यांचा ठावठिकाणा लागत नाही तोपर्यंत शंकेची पाल चुकचुकत राहणार.