कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शाही दसरा महोत्सव राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्पष्ट केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र Photo : X (@FramesbySourabh)
Published on

कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, हा जिल्हा राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. शाही दसरा महोत्सव शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात असून, म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच लोकप्रिय होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगड किल्ला, श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदीर यांसारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटकांसाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळा उपलब्ध आहेत. राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक आता किमान दोन दिवस मुक्कामी राहून पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी इत्यादी स्थळांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक रोजगार व विकास दर वाढीस मदत होईल.जिल्हाधिकाऱ्यांनी शाही दसरा महोत्सवाला राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळावा यासाठी शासनास प्रस्ताव सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला. यामुळे २०२५-२६ वित्तीय वर्षात आयोजित होणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेत कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव प्रमुख पर्यटन महोत्सव म्हणून समाविष्ट झाला आहे.

अखेर राज्य महोत्सवाचा दर्जा

२०२३ साली या महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळण्याबाबत घोषणा झाली होती, परंतु तातडीची कार्यवाही झालेली नव्हती. दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर दि. ११ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक विभागाच्या परिपत्रकात कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव राज्य महोत्सव म्हणून अधिकृत समाविष्ट केला गेला. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

भवानी मंडपाला १९१ वर्षे पूर्ण

या महोत्सवात स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जेणेकरून कलांना प्रोत्साहन मिळावे आणि भावी पिढीला या कलांची माहिती मिळावी.कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणजेच श्री अंबाबाईचे मंदीर आहे. शारदीय नवरात्र उत्सवात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून व देशभरातून किमान ३०–४० लाख पर्यटक येथे येतात. १९१ वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर रोजी भवानी मंडप कमानीचे उद्घाटन करण्यात आले होते, त्यामुळे या वर्षी २ ऑक्टोबर रोजी भवानी मंडपाला १९१ वर्षे पूर्ण होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in