

मुंबई : राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेली एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करण्याचा निर्धार सरकारने केला असून यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. अनधिकृत मासेमारीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून सुमारे २ हजार एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली.
नियम २९३ अन्वये विधानसभेत कोकणातील प्रश्नाच्या संदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला उत्तर देताना राणे यांनी बेकायदा एलईडी मासेमारी १०० टक्के बंद करणार असल्याचे सांगितले. एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर मासेमारीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गुजरात आणि गोव्यातून अनेकदा फोन येतात; मात्र, आम्ही त्याला दाद देत नाही.
आमच्या राज्यातील मच्छिमारांचे हक्क अबाधित ठेवणार असल्याचे राणे यांनी ठामपणे सांगितले. विभागातील काही अधिकाऱ्यांचा या बेकायदेशीर प्रकाराला आशीर्वाद असल्याचे निदर्शनाला आले असून अशा अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे म्हणाले.
चर्चेत सदस्य भास्कर जाधव, संजय केळकर, आदित्य ठाकरे, शेखर निकम, निलेश राणे, सुनील प्रभू, अजय चौधरी, अनंत नर, महेश सावंत, हारुन खान, मनीषा चौधरी, प्रशांत ठाकूर, सिद्धार्थ खरात आदींनी सहभाग घेतला होता.