
जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून नावे काढावीत, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच महिलांच्या या योजनेत नावनोंदणी केलेल्या पुरुषांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. २१ ते ६५ वयोगटातील आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळतात.
राज्य सरकारने मे मध्ये केलेल्या तपासणीत २,२०० हून अधिक लाभार्थी हे शासकीय कर्मचारी असल्याचे आढळले होते. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत किंवा शासकीय पगार ते घेत आहेत, ते पात्र नाहीत. निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने काही नावे चुकून आली. निवडणुका झाल्यानंतर मी सुचवले होते की, अशा महिलांनी नावे काढून घ्यावीत आणि त्यांच्यावर कारवाई करू नये. पण जर पुरुषांनी अर्ज केले असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण नको
भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या ताज्या आंदोलनाच्या हाकेवर टीका केली आणि ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण मिळवण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही दिला.
महाराष्ट्रातील ५४ टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे आणि त्यात ३७४ जाती आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही. सरकार त्यापलीकडे जाऊ शकत नाही. जर कोणी ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागत असेल, तर समाज जागरूक आहे,” असे ते म्हणाले.