

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची कबुली स्वतः सरकारने विधानसभेत दिली आहे. या योजनेचा तब्बल १२ हजार ४१५ शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लेखी उत्तरातून समोर आले असून, या अपात्र लाभार्थ्यांना सुमारे १६५ कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांकडून सातत्याने अनियमिततेचे आरोप केले जात होते. आता सरकारच्या लेखी उत्तरामुळे या आरोपांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, पडताळणीदरम्यान १२,४१५ शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले. सरकारी सेवेत असलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांनी लाभ घेतल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय काही पुरुष लाभार्थ्यांनीदेखील या योजनेचा लाभ घेतल्याची बाब पुढे आली आहे. प्रत्यक्षात ही योजना महिलांसाठी असताना पुरुषांच्या नावावर लाभ कसा गेला, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.