आता काही लाडक्या बहिणी होणार 'दोडक्या'! काही अर्जांची होणार पडताळणी; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने आता या योजनेला काही निकषांच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला होता.
आता काही लाडक्या बहिणी होणार 'दोडक्या'! काही अर्जांची होणार पडताळणी; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
Published on

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने आता या योजनेला काही निकषांच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला होता. आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना, तसेच ज्यांच्या घरी चारचाकी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यामुळे काही लाडक्या बहिणी आता सरकारसाठी ‘दोडक्या’ होणार आहेत.

‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

कोणत्याही योजनेच्या रकमेत वाढ करायची असल्यास ती अध्येमध्ये न होता अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होते. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.

पात्रतेसाठी निकष

उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखांच्या पुढे लाभार्थ्याचे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. काही महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन अर्ज केले होते. काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल, त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

तक्रार आल्यास पडताळणी होणार : वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. मात्र स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जांबाबत तक्रार दिली आहे, केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in