लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने शेतकरी गायकवाड यांच्या पत्नी औसाबाई यांनी स्वतःला नांगराला जुंपून शेताची नांगरणी केल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदतीचे निर्देश दिले. त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या गोशाळेतून शेतकऱ्याला नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने बैल खरेदी करता यावा यासाठी ३२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले.