

मुंबई : मानवी वस्तीत प्रवेश करणारे आणि मनुष्यहानीस कारणीभूत ठरणारे बिबटे हे यापुढे नरभक्षक म्हणून घोषित करणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. नागरी आणि ग्रामीण भागातील वस्तीत बिबट्या शिरत असल्याने त्याचा समावेश शेड्युल-१ मधून शेड्युल-२ मध्ये करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय वन्यजीव विभागाकडून परवानगी मागण्याचा प्रयत्न सुरू असून बिबट्याचा शेड्युल दोनमध्ये समावेश केल्यानंतर मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला मारले तर संबंधित लोकांवर कारवाई होणार नाही, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपच्या सत्यजित देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत मानवी वस्तीत बिबट्याचा वावर याबाबत लक्षवेधी मांडली होती. मानवी वस्तीत बिबट्या येण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा समावेश शेड्युल-२ मध्ये करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना नाईक यांनी बिबट्याचा समावेश शेड्युल-२ मध्ये करण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली.
राज्य सरकारने १५० बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावर केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर ५ मादा बिबट्यांना जेरबंद करून नसबंदी करण्याची परवानगी दिली असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मानव-बिबट्या संघर्षाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांमार्फत नियमित गस्त घालण्यात येत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात शाळांचे वेळापत्रक लवचिक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले.
रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवणार
जेरबंद केलेले वाघ, बिबटे आणि इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांना ठेवण्यासाठी सद्यःस्थितीत अस्तित्वात असेलल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवण्यात येत आहे. तसेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घेऊन बिबट्यांना इतर राज्यातील प्राणिसंग्रहालय आणि वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये हस्तांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती गणेश नाईक यांनी यावेळी दिली.