

पूनम अपराज/मुंबई
पुण्यातील लोहगड येथील चेतन अगरवाल हत्या प्रकरणानंतर विवाह जुळवणाऱ्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आपल्या मुला-मुलीचे लग्न निश्चित करण्यापूर्वी भावी वधू-वराची पूर्व आयुष्य तपासण्यासाठी अनेक कुटुंबे आता खासगी गुप्तहेरांची मदत घेत आहेत.
खासगी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः मुलाच्या पालकांकडून लग्नासाठी ठरणाऱ्या मुलीबद्दल सखोल माहिती मिळवण्यासाठी येणाऱ्या चौकशीच्या फोनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लोहगड प्रकरणात सिया नावाच्या तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने भावी पतीची हत्या केल्याचा आरोप आहे.
प्रकरणांमध्ये झाली वाढ
अशा प्रकारचा तपास आधीही केला जात होता, मात्र सिया प्रकरणानंतर यामध्ये मोठी वाढ झाली आहे. विवाहपूर्व तपासाची मागणी आधीपासूनच होती, परंतु सिया प्रकरणाने पालकांची सतर्कता वाढवली आहे. लग्नापूर्वी समोरच्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त सत्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आता पालक करत आहेत, असे प्रसिद्ध खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनी सांगितले. ही सेवा केवळ सामान्य कुटुंबांपुरती मर्यादित नसून राजकीय नेते, सधन कुटुंबे तसेच एनआरआयदेखील भारतातील भावी वधू-वराची पडताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधत आहेत.