
कराड : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या खासगी लक्झरी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्याजवळ घडली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान दाखवून ३२ मुला-मुलींना तातडीने बसमधून खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईतील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारी ३२ मुले आणि मुली खासगी लक्झरी बसने पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाले होती.
सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझलॉन कंपनीतील प्रोजेक्टला भेट देण्यासाठी हे विद्यार्थी निघाले होती. याचवेळी या महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर बसच्या पाठीमागील भागाला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यावेळी तात्काळ प्रसंगावधान राखत बस चालकाने बससेवा रस्त्यावर वळवत थांबवली व तातडीने मुला-मुलींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले.