
कराड : कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन विभाग आता आणखी जवळ येणार असून पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात फिरायला जाणाऱ्यांची संख्या पाहता सरकारने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केबल ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे प्रवास करण्यासाठी पर्यटकांना अनेक मार्ग आहेत, पण त्यामध्ये वेळ खूप जातो. कोकण हे निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तर पश्चिम महाराष्ट्रात राखड डोंगराच्या कुशीत सौंदर्य बहरल आहे. महाबळेश्वरसारखे थंड हवेचे ठिकाणही आहे. त्यामुळेच या दोन विभागाला जोडण्यासाठी केबल ब्रिज तयार करण्यात येणार आहे. केबल ब्रिज तयार झाल्यास सातारा आणि कोकणातील अंतर कमी होणार आहे, त्याशिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे.
केबल-स्टेड पूल बांधल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये प्रवास अधिक चांगला आणि वेगात होणार आहे. महाबळेश्वर आणि रत्नागिरीला थेट जोडणारा एक नवीन केबल-स्टेड पूल बांधण्यात येत आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सातारा जिल्ह्यातील तापोळा ते रत्नागिरीतील गडवली अहिर या ठिकाणांना जोडला जाणार आहे. या ब्रिजमुळे महाबळेश्वर आणि कोकणमधील ५० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. दोन ते तीन तासांचे कमी होणार आहे.
हा केबल-स्टेड पूल दुर्गम कोयना खोऱ्यातून जाईल आणि खेड तालुक्यातील रघुवीर घाटामार्गे रस्ता उपलब्ध करेल. हा ब्रीज तयार झाल्यास निसर्गाचा अद्भूत नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होईल. या ब्रिजचे काम पूर्ण झाल्यावर रत्नागिरीहून येणाऱ्या प्रवाशांना महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरमार्गे लांबलचक अंबेनाली घाटाचा रस्ता घ्यायची गरज लागणार नाही. त्याऐवजी, ते नव्या पुलामार्गे तापोळ्याला पोहोचू शकतील आणि कास पठारामार्गे साताऱ्याला जाऊ शकतील. या प्रवासात वेळ वाचणार आहेच, त्याशिवाय निसर्गाचा अद्भुत नजारा पहायला मिळेल.
गॅलरी पर्यटनाचे आकर्षण
मुंबईतील आयकॉनिक बांद्रा-वरळी सी लिंकपासून प्रेरणा घेऊन हा ब्रिज तयार होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिला केबल-स्टे पूल असेल. हा पूल ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असेल. पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी, मध्यभागी ४३ मीटर उंची गॅलरी उभारली जाणार आहे. ही गॅलरी पर्यटन आकर्षण ठरणार आहे. कोयना बॅकवॉटर्स आणि सह्याद्रीच्या डोंगरांमधील सूर्योदय आणि सूर्यास्त या गॅलरीमधून पाहता येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासात नवी क्रांती
मुख्य पुलाव्यतिरिक्त, बामणोली-आपटी मार्गावर आणखी एक पूल बांधला जात आहे. यामुळे तापोळा ते सातारा अंतर १० ते १५ किलोमीटरने कमी होईल. याचा फायदा स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना होईल. या दुहेरी पुलामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासात नवी क्रांती येणार आहे. पर्यटनाला चालना तर मिळेलच. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतरही कमी होणार आहे.