

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी महाराष्ट्रातील २३१ किमीच्या ९,०७२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. जबलपूर ते गोंदिया असा हा प्रकल्प असून उत्तर ते दक्षिण जोडणीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्रातील गोंदियामधून हा प्रकल्प सुरू होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, रेल्वे मंत्रालयाच्या तीन मल्टिट्रॅकिंग (अनेक मार्ग विस्तार) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे ९,०७२ कोटी इतका असून २०३०-३१ पर्यंत हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
गोंदिया – जबलपूर दुहेरीकरण पुनारख – किऊल तिसरी आणि चौथी लाईन गम्हारिया – चांडिल तिसरी आणि चौथी लाईन असे हे हे तीन प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील एकूण ८ जिल्ह्यांना जोडणार आहेत. या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३०७ किमीची वाढ होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण १२ हजार २३६ कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासाठी ५,२३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
५,४०७ गावांना जोडणारा मार्ग
हा ५,४०७ गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग आहे. जवळपास ९८ लाख लोकसंख्येला याचा थेट लाभ मिळणार आहे. मार्ग क्षमतेत वाढ झाल्याने रेल्वे वाहतुकीची गती आणि कार्यक्षमता वाढणार आहे. ऑपरेशनल कार्यप्रदर्शन सुधारेल आणि गर्दी कमी होईल. सेवा विश्वसनीयता अधिक मजबूत होईल. हे मल्टिट्रॅकिंग प्रकल्प रेल्वे संचालन अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यास मदत करतील.
त्याचप्रमाणे हे प्रकल्प नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, सर्वसमावेशक विकासाद्वारे स्थानिक नागरिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत प्रदेशाला अधिक आत्मनिर्भर बनवण्यास हातभार लावतील.