
मुंबई : सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन विविध कारणांनी गाजत असतानाच, आता थेट विधानभवनाच्या इमारतीतच फ्री-स्टाइल हाणामारी पाहायला मिळाल्याने महाराष्ट्राचा ‘बिहार’ झाल्याचे बोलले जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. नेमके काय झाले, हे कळण्याआधी विधिमंडळाच्या परिसरात एकच धावपळ उडाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
“विधिमंडळाची एक वेगळीच गरिमा असून त्या इमारतीत हाणामारी होणे चुकीचे आहे. विधिमंडळ परिसर हा विधानसभा अध्यक्षाच्या अखत्यारित येत असून त्यांनी याप्रकरणी लक्ष घालत कठोर कारवाई करावी,” अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता विधानभवनापर्यंत पोहोचला आहे. आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळ परिसरात पडळकर यांच्याकडे पाहून ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणाबाजी केली होती. यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. त्यानंतर बुधवारी विधानभवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांत बाचाबाची आणि शिवीगाळ झाली होती. त्यानंतर पडळकरांच्या एका समर्थकाने गुरुवारी आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचे विधानभवनाच्या लॉबीत तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गुरुवारी विधानभवनाच्या लॉबीत भिडले. त्यांच्यात कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार व पत्रकारांत एकच खळबळ माजली. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून, शिवीगाळही करण्यात आली.
आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत गोपीचंद पडळकर यांनी हात वर केले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. “काही गुंडांनी आपापसात मारामारी केली. विधानभवनात आमदारांवर हल्ला होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.” अशी मागणी उपाध्याय यांनी केली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. “विधानभवनात आमदार हा महत्त्वाचा असतो. पण, काही लोक बाहेरून येतात आणि हाणामारी करतात. कोणी हाणामारी केली? त्याचा शोध घ्यावा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सना मलिक यांनीही महिला आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. “गृह राज्यमंत्र्यांनी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेतली आहे. या सगळ्या घटना या विधानभवनात झाल्या आहेत. सरकारला आपले काम करावेच लागेल. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असला, कुणालाही धक्काबुक्की, मारहाण किंवा इतर काही झाले असेल, तर ते गंभीरच आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल,” असे मंत्री आशीष शेलार म्हणाले.
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
विधानभवनातील हाणामारीच्या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संपूर्ण प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “महाराष्ट्र विधानभवनात घडलेली आजची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबाबत मी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींसमोर दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो,” असे पडळकर यांनी सांगितले.
या गुंडांसह त्यांच्या पोशिंद्यांवर कारवाई करा - उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला काय अर्थ? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी, आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फारच अवघड आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोशिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात, असे मी म्हणेन,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते - जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. “भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी मी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला कुणी केला, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मला समाजमाध्यमांवर आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर अजून बरेच काही लिहिले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. सत्तेचा एवढा माज,” असा तीव्र संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.