
नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मंत्र्यांकडून नवे पायंडे पाडले जात असल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला. अधिवेशनासाठी आलेल्या काही मंत्र्यांनी शर्टाच्या खिशाला पक्षांची चिन्हे असलेले बिल्ले लावले होते. हे बघताच अजित पवारांनी (Ajit Pawar) संताप व्यक्त केला आणि म्हणाले, "मंत्र्यांनी असे पायंडे पडू नये, नाहीतर सभागृहामध्ये बेशिस्तपणा वाढेल."
पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री हा राज्याचा असतो, एकनाथ शिंदे तुम्हीही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तसेच, मंत्रीही एखाद्या पक्षाचे नसतात, ते राज्याचे असतात. त्यामुळे सभागृहात येताना कोणी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे चिन्हे लावून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करताना चिन्हे लावून येत नाहीत. त्यामुळे सभागृहात नवे पायंडे पाडायचा प्रयन्त करू नका." असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी सीमाप्रश्नावरून सरकारला घेरले.
अजित पवार म्हणाले की, सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. काही गावांनी कर्नाटकामध्ये जाण्याचा ठराव केला आहे, तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. बैठकीमध्ये जे घडले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी. तर, बेळगाव येथे मेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला. कर्नाटकची दडपशाही खपवून घेणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.