'अधिवेशन तुपाशी, विदर्भ उपाशी', दानवेंची टीका; विदर्भातील जनता मदतीपासून वंचित असल्याचा विरोधकांचा दावा

नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनतेला मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम या सरकारने केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई / नागपूर : नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनतेला मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम या सरकारने केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मंत्रिमंडळ स्थापन होऊनही विनखात्याच्या मंत्र्याचे अधिवेशन झाले. मागील काळातील योजना व दिलेले खोटे आश्वासने व दिवा स्वप्न दाखवण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतकरी, कामगार, युवक व बेरोजगारांना कोणतेही न्याय व मदत सरकारने जाहीर केली नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

एसटी बस खरेदीतील गैरव्यवहार, बोगस औषधे, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष माणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात सरकारला सळो की पळो करून सोडले आणि भविष्यात महाविकास आघाडीची हीच भूमिका यापुढे असेल, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड फरार आहे. परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी वाचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाणीत शॉक बसून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. कल्याण येथे परप्रांतीय माणसाने मराठी कुटुंबावर हल्ला केला, आदी घटना हे सरकार आल्यावर घडल्याचा आरोप दानवे यांनी केला.

कांदा निर्यात धोरण बदलण्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा, विमा, प्रोत्साहन नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असताना आरोपींना वाचवण्यासाठी हे सरकार काम करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. पुणे, मुंबई, नागपूर शहरात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.

विकासासाठी रुपयाही नाही - दानवे

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी स्थिती राज्यात नाही. सरकारने २०२४- २५ वर्षांसाठी सादर केलेल्या पुरवणी मागणीत विकासासाठी सरकारने एक रुपया दिला नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांचा अवमान केला त्यावर माफी मागण्याऐवजी त्यावर विरोधकांनी काय काय केले, हे भाजपचे नेते सांगत राहिले. त्यामुळे त्यांची आंबेडकर यांच्याविषयी भूमिका काय आहे हे स्पष्ट होते. मराठवाड्यासाठी सरकारने सिंचन प्रकल्प जाहीर केले मात्र त्याला निधी दिला नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in