
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांची तटबंदी करा, त्याठिकाणी काम करणारे कामगार तसेच या जागेत वावर असणाऱ्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी असे आदेश राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. सागरी सुरक्षेबाबत बुधवारी आयोजित बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले.
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्राला विस्तीर्ण असा ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यावरील सर्व बंदरे, मत्स्य व्यवसाय प्रकल्पावर सुरक्षा संदर्भात पावले उचलावीत असे निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिले.
कामगारांनी ओळखपत्र बाळगावे
बंदरे आणि समुद्र किनारपट्टीवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्याची सूचना देखील राणे यांनी यावेळी केली. सर्व कामगारांनी ओळखपत्र बाळगावे सर्व व्यक्तींची चौकशी करण्याबाबत तत्काळ नोटीसा संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात याव्यात, असे ते म्हणाले.