

नागपूर : राज्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी महिन्यापासून देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
राज्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री मकरंद पाटील बोलत होते. सदस्य निलेश राणे, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.
राज्यात विशेषतः कोकणात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत अद्याप सुरू नसून ती डिसेंबरनंतर वितरित केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सलग सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केंद्रीय मदतीशिवाय अतिरिक्त मदत देत आहे. एनडीआरएफच्या मदतीबरोबरच रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त १० हजार देण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे जमीन खरडून वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४७ हजार नियमित मदत दिली असून, याशिवाय मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर ३ लाख रुपये देण्याचा शासनाने निर्णयही घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत २० हजार कोटींची मदत
राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसानभरपाईपोटी यंदा सुमारे २० हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी १४ हजार कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे (डीबीटी) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. खरीप हंगामात ९० लाख शेतकऱ्यांना ७,१५६ कोटी, तर रब्बी हंगामात८५.७८ लाख शेतकऱ्यांना ६,८६४ कोटी रुपये वितरित करण्यात आले, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.