

मुंबई : राज्यात झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे १ लाख २२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा गहू, मका, हरभरा, ज्वारीसह फळपिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली.
दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.
फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
राज्यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष आदी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी आणि खतांचा खर्च वाया गेला आहे.
जिल्हावार झालेले नुकसान
नाशिक........२९ हजार ८१२ हेक्टर
अहिल्यानगर ..........२३ हजार ६३३ हेक्टर
जळगाव.........२२ हजार ३६१ हेक्टर
धुळे........... १४ हजार ८३२ हेक्टर
बुलढाणा.........८ हजार ५०७ हेक्टर
छत्रपती संभाजीनगर........८ हजार ४४५ हेक्टर
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.
दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री