राज्यात ४७ हजार मतदार 'शंभरी' पार; तरुण मतदारांची संख्या २२ लाखांच्या घरात, ९ कोटी ७० लाख मतदार करणार फैसला

२० नोव्हेंबरला ९ कोटी ७० लाख मतदार महायुती व महाविकास आघाडीसह राज्याचे भवितव्य निश्चित करणार आहेत.
राज्यात ४७ हजार मतदार 'शंभरी' पार; तरुण मतदारांची संख्या २२ लाखांच्या घरात, ९ कोटी ७० लाख मतदार करणार फैसला
Published on

मुंबई : निवडणुकीत मतदारांचा कौल निर्णायक असतो. राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे ९ कोटी ७० लाख मतदारांमध्ये वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार आहेत, तर १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तरुण मतदार आहेत.

२० नोव्हेंबरला ९ कोटी ७० लाख मतदार महायुती व महाविकास आघाडीसह राज्याचे भवितव्य निश्चित करणार आहेत. नगरसेवक पदाची निवडणूक असो वा खासदारकीची मतदारराजाचा कौल हा पक्षाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण असतो.

यंदाची विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे मतदारराजा कुठल्या पक्षाला पसंती देणार हे २३ दिवसांनी स्पष्ट होईल. दरम्यान, लोकशाहीच्या या उत्सवात मतदारराजाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४, तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील मतदार

पुरुष - ५ कोटी २२ हजार ७३९

महिला - ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९

तृतीयपंथी - ६,००१

■ एकूण मतदार - ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९

१८ ते १९ वयोगटातील तरुण मतदार

पुरुष - १२ लाख ९१ हजार ८४७

महिला - ९ लाख ३० हजार ७०४

तृतीयपंथ - १५३

२० ते २९ वयोगटातील तरुण

पुरुष - १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२

महिला - ८६ लाख ८० हजार १९९

तृतीयपंथ - २,३९४

वयाची शंभरी पार मतदार

पुरुष - २० हजार ९८३

महिला - २६ हजार १८४

तृतीयपंथी - २

एकूण शंभरी पार मतदार - ४७,३९२

logo
marathi.freepressjournal.in