
मुंबई : परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
परकीय गुंतवणुकीचा चढा आलेख (कोटी रुपयांत)
२०१५ - १६ - ६१,४८२ कोटी
२०१६ - १७ - १,३१,९८० कोटी
२०१७ - १८ - ८६,२४४ कोटी
२०१८ - १९ - ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ - २५,३१६ कोटी
२०२० - २१ - १,१९,७३४ कोटी
२०२१ - २२ - १,१४,९६४ कोटी
२०२२ - २३ - १,१८,४२२ कोटी
२०२३ - २४ - १,२५,१०१ कोटी
२०२४ - २५ - १,६४,८७५ कोटी